



नागपूर ः वर्षभरापूर्वी भंडारा जिल्ह्यातून नागपूरला पोटाची खळगी भर

ण्यासाठी आलेल्या रवींद्र बोरकर यांनी रेशनकार्डची नागपूरला बदली केली. त्यानंतर त्याला रेशनकार्डही मिळाले. मात्र, सहा महिन्यांपासून त्याच्या कार्डला ऑनलाइन मान्यता मिळत नसल्याने नागपूर अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कार्यालयात त्याला हेलपाट्या खाव्या लागत आहेत. धान्यासाठी त्याची वणवण सुरूच असून ती कधी थांबेल, असा प्रश्न त्याला पडला आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते राजानंद कावळे यांनी दिला आहे.
कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. गावात काम नाही म्हणून अनेकजण नागपुरात कामासाठी आले. यातील रवींद्र बोरकर हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कामासाठी २०२० मध्ये ते नागपुरातील नरसाळा येथे आले. गावाकडे त्यांचे रेशन कार्ड पिवळे होते. दारिद्र्यरेषेखालील लोकांना हे कार्ड देण्यात येते. येथे आल्यानंतर त्यांनी मार्च २०२० मध्ये नागपूरच्या मेडिकल झोनच्या अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्याकडे बदली कार्डासाठी अर्ज केला. त्याकरिता त्यांनी भंडारा जिल्ह्यातून जिल्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कार्ड बदलीची रीतसर परवानगीही घेतली. त्यानंतर कार्यालयातून त्याला केशरी कार्ड देण्यात आले. त्याला आता सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, त्याच्या कार्डला ऑनलाइन मान्यता न मिळाल्याने त्याला स्वस्त धान्य मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तो पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयात विचारणा करीत आहे. आज-उद्या काम होईल, अशी बोळवण करून अधिकारी त्याला घरी पाठवीत आहेत. कार्ड असूनही त्याला धान्य मिळत नसल्याने दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या रवींद्र बोरकर व त्याच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाची ‘एक देश एक कार्ड’ ही योजना फक्त देखावा असल्याचे दिसून येते.
नवीन रेशनकार्डावर धान्य पुरवठा करण्याची मान्यता प्रक्रिया मुंबईहून होते. ती प्रक्रिया सध्या बंद आहे. मान्यतेचा कोटा पूर्ण झाल्याची माहिती आहे. वाढीव कोटा आल्यास अर्ज तातडीने मान्य करण्यात येईल.
श्री. ठाकरे, पुरवठा अधिकारी (मेडिकल झोन, नागपूर).