
दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर : गत काही वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र कामठी नगरपरिषदेची निवडणुक चांगलीच चर्चेत आहे. येथे मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांनी सर्व आरोप फेटाळून लावत भाजपाचा विकासाचा झंझावात बघून यंदाच्या नगराध्यक्षाची निवडणूक भाजप जिंकत असल्याचे चित्र स्पष्ट होते. आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने माजी मंत्री सुलेखा कुंभारे आणि काँग्रेसचे उमेदवार शकुर नागानी यांनी षडयंत्र रचून माझ्या मामेभावाच्या फार्म हाऊसमध्ये बोगस मतदानाचे साहित्य आणि रोख रक्कम ठेवून माझ्या नावाने खोटा प्रचार केला, असा प्रत्यारोप त्यांनी पत्रपरिषदेतून केला.
कामठी नगरपरिषदेसाठी मंगळवारी मतदान सुरू असताना सुलेखा कुंभारे यांनी तक्रार केली की अजय अग्रवाल यांचे मामे भाऊ सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर शाई मिटविण्याचे साहित्य, दारूच्या बाटल्या तसेच रोख रक्कम आहे. भाजपचे अग्रवाल यांच्यासाठी बोगस मतदान करविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कुंभारे यांनी मंगळवारी केला. त्याच्या प्रत्युत्तरात अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, उलट कुंभारे यांनी नागानी यांच्यासोबत षडयंत्र रचून स्वत: हे साहित्य त्या फार्म हाऊसवर ठेवले. तसेच स्वत:च छापा टाकला आणि माझ्याविरुद्ध खोटे आरोप केले आणि माझा, भाजप आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपप्रचार केला. या प्रकरणी पोलिसांनीसुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांचा माझ्याशी काहीच संबंध नाही. हे फार्म हाऊस कामठीच्या बाहेर आहे. त्याचा भाजपशी काहीच संबंध नाही. कुंभारेंनी स्वत:च हा सगळा बनाव रचला.’ या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच कामठीचे तालुका अध्यक्ष अनिल निधान उपस्थित होते.
राजकीय द्वेषातून षडयंत्र
यंदा अजय कदम यांना उमेदवारी न देता मला देण्यात आली. याचा राग धरून कुंभारे यांनी पहिल्या दिवशीपासून आमच्याविरोधात षडयंत्र रचले आहे. काही भागांमध्ये आम्ही प्रचार सभेची परवानग्या घेऊनही आमच्या प्रचार सभा होऊ दिल्या नाहीत. आमच्या रॅलीसमोर मुद्दाम डिजे लावण्यात आले, आमचे रस्ते रोकण्यात आले, आमचा प्रचार होऊ दिला नाही. हे सगळे कुंभारे यांनी राजकीय द्वेषातून केले आहे, असा आरोप अग्रवाल यांनी केला.
कुंभारेंचे दरवाजे बंद करून बावनकुळे चार वेळा विजयी
या निवडणुकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामठीतील दरवाजे बंद करून टाकू, असा इशारा कुंभारे यांनी दिला आहे. यावर ‘कुंभारेंचेच दरवाजे बंद करून बावनकुळे कामठी विधानसभेत चार वेळा निवडून आलेत. त्या काय बावनकुळेंसाठी दरवाजे बंद करतील. आणि त्यांचे उमेदवार अजय कदम या निवडणुकीत कुठे आहेत हे निकालानंतर कळेलच. भाजप यंदा नगराध्यक्षाची निवडणूक पाच हजारांच्या मतांधिक्क्याने जिंकेल,’ असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

