
नागपूर ः शेतकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी सतत लढा देणारे नेते आणि काँग्रेसचे नेते राजानंद कावळे यांचे अल्पशा आजाराने मेडिकलमध्ये आज, (ता.२१) निधन झाले. मृत्यूसमयी ते ५५ वर्षांचे होते. सोमवारी, (ता.२२) सकाळी ९ वाजता कुही तालुक्यातील दहेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
गेल्या ३० वर्षांपासून राजानंद कावळे काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्याप्रमाणे त्यांनी शेतकरी व कामगारांचे प्रश्न सुटावे याकरिता शेतकरी, कामगार सुरक्षा संघटनेची स्थापना केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला अनेकदा धारेवर धरले होते. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांचे ते विश्वासू होते. राजानंद कावळे हे आयुष्यभर जनसामान्य कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. गोरगरिबांना व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असायचे. अनेक आंदोलनात आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचा एक हक्काचा आणि लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांच्यासह अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केला. त्यांच्या अकाली जाण्याने कुही तालुका व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला कावळे, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.

