
दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः आवाज उठू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांनी या संदर्भात पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
कोराडी प्रकल्पात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम व तांत्रिक कामे सुरू असून, मुख्य संयंत्राचे काम खासगी कंपन्यांकडून केली जात आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेत स्थानिक युवकांना संधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. महादुला व परिसरातील अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे साधन या प्रकल्पावर अवलंबून आहे. हातमजुरी, वाहनधारक, लघुऔद्योगिक सेवा देणारे स्थानिक व्यावसायिक यांना कामापासून दूर ठेवले जात असल्याने बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः, स्थानिक असल्याचे कोणतेही निकष न लावता बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकल्प परिसरात वाढलेले प्रदूषणही स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. औष्णिक वीज केंद्रातून निघणारा धूर, कोळसा व राख वाहतुकीमुळे होणारी धूळ, तसेच अवजड वाहनांची सततची वर्दळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व अडचणी सहन करूनही स्थानिकांनी प्रकल्पाला सहकार्य केले, मात्र रोजगाराच्या बाबतीत त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. भूषण चंद्रशेखर यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून, परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, कोराडी प्रकल्पातील किमान ८० टक्के कामे स्थानिक भूमिपुत्रांना देण्यासाठी स्पष्ट धोरण आखावे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोराडी प्रकल्पात कामे करणे सामान्य माणसाच्या हातात नाही. विशिष्ट व्यक्तीच्या शिफारशीशिवाय खासगी कंपन्यांमध्ये कामे वा रोजगार उपलब्ध होणे शक्य नाही. यामुळे स्थानिक युवकांवर अन्याय होत आहे. पालकमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
-भूषण चंद्रशेखर, जिल्हाध्यक्ष, कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस(एपी), नागपूर

