Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भसंपादकीय

बाबासाहेब ः केदार ते सहकार

छत्रपाल ऊर्फ बाबासाहेब केदार यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२८ रोजी पाटणसावंगी येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विद्यार्थी दशेपासून त्यांचा काँग्रेसशी संपर्क आला. विद्यार्थी चळवळीत कार्यरत असतानाच त्यांनी राजकारणात उडी घेतली. दादासाहेब कन्नमवार यांच्याशी भेट झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झाले.विदर्भातील सहकाराची चळवळ सुदृढ करण्यात बाबासाहेबांचे अख्खे आयुष्य गेले. सूतगिरण्या, तेल गिरण्या, दुग्ध कारखाने, कृषी पणन बाजार समित्या, कृषी औद्योगिक चळवळ, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर बाबासाहेबांनी संघर्ष करून सहकाराला संजीवनी दिली. त्यांची आज जयंती.

‘केदार ते सहकार’ आश्चर्य वाटले असेल. आश्चर्य आहेच. हा दोन कर्तृत्ववान पिढ्यांचा संगम आहे. तिसरी पिढी त्या वाटेवर आहे. केदार या नावावर अधिक बोलण्याची गरज आहे. गेल्या ५० वर्षांत या नावाचा महिमा नागपूर जिल्ह्यातच नव्हेतर विदर्भात राहील आहे. शेतकरी कुटुंबात १५ नोव्हेंबर १९२८ जन्मलेले बाबासाहेब ऊर्फ छत्रपाल आनंदराव केदार. सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील हे कुटुंब. अत्यंत सामान्य कुटुंबात बाबासाहेबांचा जन्म झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या त्यांच्यावर प्रभाव होता. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असताना त्यांच्या मगरमिठीतून देशाला सोडविण्याचे त्यांचे स्वप्न होत. फक्त स्वप्नच नाही तर त्याकरिता बलिदान देण्याची धमकी त्यांच्या मनगटात होती. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. देशभक्तीचा रक्त त्यांच्या नसानसात होते. देशासाठी प्राण गेले तरी चालेल मात्र,माझ्या मातृभूमिला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवेनच. असा त्यांचा ध्यास होता. स्वातंत्र्य चळवळीत असताना वडील १९४२ आंदोलनात तुरुंगात गेले. तेव्हा ते १४ वर्षांचे होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना समाज कार्यात पाय ठेवले. १९४६ मध्ये वडिलांसोबत तुरुगांत गेले. मायभूमीचे जोखडदंड तोडण्याचा जणू काही वसा त्यांनी घेतला होता. स्वातंत्र्याच्या ध्यास घेऊन निघालेल्या कोवळ्या मनावर आघात झाला. १८ वर्षांचे असताना त्यांचे वडील आनंदरावर यांचे निधन झाले. आठ भावंडाची जबाबादारी त्यांच्यावर आली. अंत्यत कठीण समय होता. ते डगमगले नाही. खंबीर राहिले. शेती करून कुटुंबाचे कर्तव्य पार पाडू लागले. पण, उत्पादन कमी आणि खर्च अधिक असल्याने ते हताश झाले. प्रसंग आणि समय कठीण होता. मात्र, वडिलांचे आशीर्वाद त्यांची शिकवण त्यांच्या पाठीशी होती. हिमालयासारखे ते स्थिर राहिले. प्रसंगाशी दोन हात करण्याची त्यांची तयारी होतीच.

कठीण प्रसंगातून काढली वाट
अनेक कठीण प्रसंगातून त्यांना वाट काढली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. छत्रपाल केदारचे ते बाबासाहेब केदार झाले हे त्यांनाही माहिती नसावे. राजकारण, समाजकारणाच्या सोबतीला त्यांनी जोड दिली ती सहकाराची. विदर्भातील प्रत्येक गावात सहकारी संस्था दिसतात. ती पुण्याई फक्त बाबासाहेब केदार यांची आहे.
वडिलांसोबत राहत असताना त्यांनी अनेक गोष्टी बघितल्या. आंदोलनातील त्यांचा सहभाग. हे सर्व त्यांच्यासमोर होते. यातून त्यांनी राजकारणाकडे वळले. बाबासाहेब केदार यांनी १९६० मध्ये राजकारणात प्रवेश केला. बॅरिस्टर शेषराव वानखेडे त्यांचे राजकीय गुरू होते. ते १९६० मध्ये जनपतचे सचिव झाले. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्या आणि नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान केदार यांना मिळाला. बाबासाहेब केदार १९६२ ते १९७७ पर्यंत दीर्घकाळ या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मधला काही ते अध्यक्ष नव्हते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर भर दिला. प्रत्येक गावात पाणी मिळेल याकरिता त्यांनी नळ योजना, ग्रामीण रस्ते व प्राथमिक शिक्षण यांवर अधिक जोर दिला. आरोग्याच्या सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले.
पाटनसावंगी, खापरखेडा, सिलेवाडा, धापेवाडा, व्याहाड येथे लोकवर्गणीतून शिक्षण संस्था सुरू केल्या. सहकार चळवळ रुजविण्याची सुरुवात त्यांनी सावनेरातून केली. त्यांनी सहकारातील पहिला प्रयोग १९७०-१९७२ मध्ये सुरू केला. श्रीमंत शामराव देशमुख यांची सावनेर येथील खासगी जिनिंग प्रिसिंग प्रेस उधारीवर विकत घेतली होती. तिला खासगी न करताना सहकारातून सुरू केली. सहकार क्षेत्रातील त्यांची घौडदौड सुरू होती. ते १९७९ मध्ये महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात १९८१ मध्ये शेषराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या आधारावर कापूस समितीला महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीपासून विभक्त केले. विदर्भ व मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीचे ते प्रथम अध्यक्ष होते. इंदिरा गांधी यांनी कापूस उत्पादकाच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्याचे धोरण स्वीकारले. या धोरणाचा लाभ त्यांनी घेतला.नागपूर जिल्ह्यात घरोघरी फिरून भागभांडवल जमा केले. हिंगणा तालुक्यातून जास्त भागभांडवल जमा झाल्यामुळे त्यांनी हिंगण्याजवळील वानाडोंगरी येथे सूतगिरणी उभारली. आशिया खंडात सर्वात मोठे व सर्व सुखसोईंनी युक्त असलेली बाजारपेठ नागपूर कळमना येथे उभे करण्याचे श्रेय केदार यांनाच जाते. रस्ते, शेतकरी निवास, पाण्याच्या सोई उत्कृष्ट स्वरूपात त्यांनी येथे उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण क्षेत्राबाबतचा केदार यांचा अभ्यास लक्षात घेता त्यांच्याकडे १९९१ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात आला. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे बदल केले. सहकार म्हणूनच त्यांना सहकार महर्षी म्हणून लोक ओळखू लागले. विदर्भातील गावात त्यांना न ओळखणारा माणूस मिळणार नाही, असे अनेक जाणकार सांगतात.

आशिया खंडातील बाजारपेठ
कापूस आणि संत्री ही नागपूर-विदर्भाची खरी ओळख आहे. कापूस उत्पादकांना विक्रमी भाव मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला. संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांनी सरकारकडे तगादा लावला होता. याच प्रयत्नातून त्यांनी नागपुरी संत्री इराणपर्यंत पोहोचविली. कापूस निर्यातीतून अधिकाधिक नफा मिळविण्यावर त्यांचा भर होता. शेतमालांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी ते झटले. शेतकऱ्यांना अधिकाधिक दर मिळावा, ही त्यांची कळकळ होती. सहकार हा त्यांच्या विलक्षण आत्मीयतेचा विषय होता. नागपूरच्या सुसज्ज कळमना मार्केट यार्डच्या उभारणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आशियातील सर्वात मोठे मार्केट यार्ड म्हणून आज या बाजारपेठेची ख्याती आहे. गुरांपासून भाजीपाल्यांपर्यंतच्या विविध कृषीपयोगी वस्तूंची ही १२० कोटींची देखणी बाजारपेठ उभी करताना बाबासाहेब केदारांनी घेतलेली मेहनत अनेकांच्या स्मरणात आहे. कृषी औद्योगिक संघ, सूतगिरणी, दूग्ध उत्पादन संघ, महाराष्ट्र कापूस पणन महासंघ यासारख्या संस्था-संघटनांमध्ये स्वतः अक्षरशः राबून त्यांनी सहकार मंत्र रुजविला. शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांना जादा दर मिळावा हाच त्यांचा ध्यास होता.
राजकारणात घट्ट पावले रोवतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील काम सुरू केले. सावनेर तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करून त्यांनी विदर्भातील सहकार क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला. साधारण १९६५ पासून ते सहकार क्षेत्रात सक्रिय झाले. जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करून सावनेर आणि बेला येथे तेल गिरणी प्रकल्प त्यांनीच सुरू केले. रामटेक, मौदा, भिवापूर या भागात भात शेतीक्षेत्रात लक्ष घालून त्यांनी सहकारी भात गिरणी सुरू केली. पाटणसावंगीत खांडसरी साखर कारखाना, पारशिवनी येथे जिंनिंग सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटचे बांधकाम त्यांच्याच काळात झाले. नागपूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करून जिल्ह्यातील दूध उत्पादनांच्या विक्रीचे माध्यम त्यांनी सुरू करून दिले.

विदर्भातील सहकार चळवळीचे प्रणेते
विदर्भातील सहकाराची चळवळ सुदृढ करण्यात बाबासाहेबांचे अख्खे आयुष्य गेले. सूतगिरण्या, तेल गिरण्या, दुग्ध कारखाने, कृषी पणन बाजार समित्या, कृषी औद्योगिक चळवळ, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर बाबासाहेबांनी संघर्ष करून सहकाराला संजीवनी दिली. छत्रपाल ऊर्फ बाबासाहेब केदार यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२८ रोजी पाटणसावंगी येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विद्यार्थी दशेपासून त्यांचा काँग्रेसशी संपर्क आला. विद्यार्थी चळवळीत कार्यरत असतानाच त्यांनी राजकारणात उडी घेतली. दादासाहेब कन्नमवार यांच्याशी भेट झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झाले. त्यांची आज जयंती.


हुकूमचंद आमधरे म्हणतात,
त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करणारे हुकुमचंद आमधरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणतात, बाबासाहेबसारख्या व्यक्तीमत्त्वासोबत आम्ही काम करणे हे आमचे भाग्य आहे. सहकार क्षेत्राचा विकास करताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सहकार क्षेत्रात त्यांनी नातेवाईकांना कधीच थारा दिला नाही. काम करणारा कोणताही कार्यकर्ता असो त्याला त्यांनी पुढे केले. म्हणूनच मला आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीच्या उपसभापतीपदी मला निवडले. त्यांच्या सोबत काम करताना कधीही परकेपणाची भावना नव्हती. कार्यकर्ता हे त्यांची संपत्ती होती. कार्यकर्त्यांच्या कामापुढे आपल्या पोटच्या मुलालाही कधी-कधी संधी न देता डावलत असत. बाबासाहेब असे थोरे व्यक्तीमत्व असल्याचे हुकूमचंद आमधरे सांगत होते. राजकारण आणि समाजकारणात त्यांची दुसरी पिढी स्थावर झाली. आमदार सुनील केदार दोनदा मंत्री झाले. सध्या आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी पाय घट्ट रोवले आहेत. ते राज्याच्या राजकारणात स्थावर होत आहेत. तर त्यांची मुलगी पौर्णिमा केदार राजकारणात प्रवेश करू पाहत आहे. वडिलांच्या पुण्यावर राजकारणात प्रवेश टाळत मतदारसंघात काम करून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज, बाबासाहेब केदार यांची जयंती. सहकार क्षेत्रातील पितामहास जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

चंद्रशेखर रामदास महाजन
प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी,
भारत गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर,
नरसाळा रोड, नागपूर.
मो. ९८५०२०९७१०
(संदर्भ ः पुस्तके आणि गुगल)

(ही पोस्ट फेसबुकवरून घेण्यात आली)

संबंधित पोस्ट

समाजातील युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

divyanirdhar

जीएसटी अनुदान महिन्याला १०८ कोटी ; मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांची माहिती

divyanirdhar

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रम, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा पुढाकार

divyanirdhar

कार्यकर्त्यांचा वाणवा तरीही राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाचे एकला चलो रे तुणतुणे…

divyanirdhar

हिंगणा, कुहीसाठी भाजपने फुंकले रणशिंग; जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्त्वात उमेदवारांच्या मुलाखती

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या दौऱ्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह

divyanirdhar