



पुणे : देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या मेघालयातील चेरापुंजीच्या स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातून महाबळेश्वरचा समावेश होत होता. एक-दोन वर्षे चेरापुंजीपेक्षाही महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. मात्र, यंदा रत्नागिरीचा पाऊस चेरापुंजीच्या स्पर्धेत उतरला आहे.
महाबळेश्वरमध्ये सध्या तरी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक पावसाच्या भागांमध्ये यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, महाबळेश्वर आणि मुंबई शहराचा समावेश आहे.
देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. यात चेरापुंजीने पावसाच्या प्रमाणाचे मोठे विक्रम केले असल्याने देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी ते एक ठिकाण समजले जाते. मात्र, २०१७ ते २०१९ या तीन वर्षातील स्थिती पाहिल्यास चेरापुंजीत पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. याच वेळी महाबळेश्वर आणि पुणे जिल्यातील ताम्हिणीच्या घाटक्षेत्रातील पाऊस चर्चेत आला. २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांत महाबळेश्वरमध्ये पावसाने विक्रम नोंदवित चेरापुंजीला मागे टाकले होते. मात्र, २०२० मध्ये महाबळेश्वरचा पाऊस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन चेरापुंजीत पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पाऊस नोंदविला गेला. कर्नाटकातील होनावर यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होते.
यंदा पावसाचे चित्र आणखी बदलले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देशातील पावसाचे महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांच्या पावसाची दररोज नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार यंदा रत्नागिरीतील पाऊस चेरापुंजीच्या स्पर्धेत आला आहे. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १२०० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. चेरापुंजी मात्र अद्याप पावसाची सरासरी पूर्ण करू शकलेले नाही. रत्नागिरीत जिल्ह्यातील हर्णे येथे १ जूनपासून २५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा १३०० मिलिमीटरने अधिक आहे. महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी २२०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.