
दिलीप शिरभाते : दिव्य निर्धार वृत्तसेवा
बेसा (जि. नागपूर) : ‘पाणी म्हणजे जीवन’ ही घोषणा कागदावरच उरली असून नागपूरजवळील गोटाळ–पांजरी परिसरात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. मात्र ग्रामपंचायतीने या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी केवळ आश्वासनांवर दिले आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईची तीच समस्या निर्माण होते. यावर्षी मात्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच परिस्थिती बिकट झाली आहे. गावातील अनेक भागांत नळांना दिवसेंदिवस पाणी येत नाही. काही ठिकाणी आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाणीटंचाईचा फटका आता सामान्य नागरिकांसोबत प्राण्यांनाही बसत आहे. परिसरातील मोकाट जनावरांनाही पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. जनावरांसाठी एकही पाण्याचा हौद उपलब्ध नसल्याने ग्रीन सिटी सोसायटी परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या गढूळ आणि दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरच जनावरे तहान भागवत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. उघड्यावर साचलेले हे सांडपाणी परिसरात दुर्गंधी पसरवत असल्याने वायू आणि जलप्रदूषण वाढत आहे. त्याच सांडपाणी पिल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची भीती आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी काही तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. सर्वप्रथम टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच गावातील सर्व बोअरवेल, हातपंप आणि जलस्रोतांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी आहे.
रस्त्यावरील सांडपाण्यामुळे धोका
सभोवतालच्या सोसायट्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याचा योग्य निचरा करून उघड्यावर साचणारे सांडपाणी त्वरित बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आरोग्य विभागामार्फत तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, ग्रामपंचायतीने उन्हाळी पाणीटंचाई आराखडा (कंटिजन्सी प्लॅन) तातडीने जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला आहे.
ग्रीनसिटी सोसायटी, सिंगापूरसिटी, कस्तुरीसिटी परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर जनावरे तहान भागवत आहेत. उघड्यावर सोडलेले सांडपाणी वायू व जलप्रदूषण वाढवत असून, त्याच सांडपाण्याचे घाण पाणी जनावरे पीत आहेत, त्यामुळे त्याचा आरोग्यावर गंभीर व दूरगामी परिणाम होत आहे. या परिसरात सांडपाण्याची कायम व्यवस्था करावी.
– ॲड. स्मिता धनविजय (मेश्राम), सिंगापूर लाईफ सिटी, गोटाळ-पांजरी (ग्रामीण) नागपूर
गेल्या अनेक वर्षांपासून ही जीवनावश्यक समस्या कायम असताना ग्रामपंचायतीकडून आजतागायत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीच झाले नाही. ग्रामपंचायतीकडे आतुरतेने
नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहत आहे, आता तरी जीवन प्राधिकरणाचे पाणी द्यावे.
-नंदा बागलावे, गोटाळ-पांजरी, नागपूर

