दिव्यनिर्धार /प्रतिनिधी
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसोबतच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता.एक) कर्मचारी व अधिकार्यांनी काळ्याफीती लावून कामकाज केले.
कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी सेवा देत आहेत. नागरिकांना शुद्धपाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर आहेत. असे असतानाही शासनाकडून प्राधिकरणातील कर्मचार्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सातव्या वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. मात्र, अजूनही कर्मचार्यांना वेतन आयोगाचा लाभ देण्यात आलेला नाही. परिणामी, कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. सातवा वेतन आयोगासोबतच सहाव्या वेतन आयोगातील 24 वर्षांचा कालबद्ध पदोन्नती व सुधारित वाहतूकभत्ता लागू करावा, सेवानिवृत्त कर्मचार्यांना ग्रॅज्यूएटी, रजा रोखीकरण, भविष्यनिर्वाह निधीचे पैसे सेवानिवृत्तीच्या दिवशी देण्यात यावे, अभियंता, प्रथम लिपिक, वरिष्ठ लिपिक व अन्य संवर्गातील पदोन्नती करण्यात यावी, रेखाचित्र, भांडार शाखेतील कर्मचार्यांचा पाचवा वेतन आयोग थकबाकी देण्यात यावा, कोरोनाच्या काळात कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांना 50 तसेच 25 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गजानन गटलेवार, अभिमन्यू डोळस, दीपक धोटे, बाळासाहेब वसू, निशिकांत ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.