रामटेक,(नागपूर) ः . संक्रमितांसह मृत्युसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटला होता. मात्र अशा परिस्थितीतही रामटेक तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल आठ गावांनी या घातक महामारीला गावाची सिमारेषा पार करू दिली नाही. कोविड-१९ महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहरामध्ये जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. सध्या जरी परिस्थिती नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपूर्वी भयावह परिस्थिती झाली होती
याबाबत रामटेक पं.स. चे गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रामटेक तालुका नागपूर जिल्ह्यातील आदीवासीबहुल तालुका असून तेथील साक्षरता ८२ टक्के आहे. ४० टक्क्यांपेक्षा थोडी जास्त लोकसंख्या ही आदीवासी आहे. गावे दुर्गम भागात आहेत. नागपूरपासून लांब आहेत. येथील आरोग्य यंत्रणेत उपजिल्हा रुग्णालय रामटेक, ग्रामीण रुग्णालय देवलापार व पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तथा ३२ उपकेंद्रांचा समावेश असून या सर्वांमार्फ़त आरोग्यसेवा पुरविली जाते.
कोरोना रोगाची तिव्रता कमी व्हावी व रुग्णदर, मृत्यूदर वाढू नये म्हणून पहिल्या लाटेदरम्यान ग्रामपंचायत पातळीवर अनेक उपायोजना व कार्यक्रम राबवले गेले. तरी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थांबविता आली नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये पॉझिटीव्ह रुग्ण निघाले. त्यांच्यावर आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करुन रुग्ण बरेही झाले. आता या दुसऱ्या लाटेत तर तालुका अक्षरशः हादरून गेलेला होता. परंतु अशाही परिस्थितीत आठही गावातील लोकांचे योग्य नियोजन तथा वेळीच घेतलेली खबरदारी, ग्रा.पं. प्रशासनामार्फत वेळोवेळी राबविलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरीकांनी पाळलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचना व वेळोवेळी शासकीय लॉकडाउन व इतर सूचना आणि ग्रामस्थांचा दृढ निश्चय, सकारात्मक मानसिकता या सर्व बाबींमुळे तालुक्यातील आठ गावेही कोरोनामुक्त राहिली. याबाबत तालुक्यामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून त्या गावांमध्ये रमजान, सोनपूर, चिकणापूर, मुरडा, भिमानटोला, पुसदा-२, खिंडसी, गोंडीटोला या आठ गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील विविध अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तथा सहकार्य मोलाचे ठरले आहे. तसेच योग्यवेळी तपासणी, उपचार, टेस्टिंग, लसीकरण, जनजागृती यासुद्धा जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत.
रामटेक तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायत अंतर्गत १५२ गावे आहेत. १३ लाख २० हजार ग्रामीणची जवळपास लोकसंख्या आहे. मागील वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना काळात तालुक्यात आतापर्यंत एकूण ऑनलाईन रिपोर्टींगनुसार ७२२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६९८७ बरे झाले. ९८ जनांचा मृत्यू झाला, तर सद्या १४२ हे उपचार घेत आहेत.